श्रीगोंदाः प्रतिनिधी
१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर त्यांनी एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत अशा शब्दात शरद पवार यांनी टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचारार्थ जाहीर सभेत ते श्रीगोंदा येथे बोलत होते.
काय करायचं आता… काही कामच नाही म्हणतात… नाचता येईना अंगण वाकडे…१३ वर्ष मंत्री पदाची संधी दिली काय कमी गोष्ट आहे का… असा सवालही त्यांनी केला.
अनेकांना मी महाराष्ट्रात मोठं करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री येथे आले होते. त्या सभेत बबनराव पाचपुते यांनी भाषण केले की १३ वर्ष मंत्री केले. परंतु फक्त सहीचा अधिकार होता. परंतु मंत्र्यांनी सही केली की आदेश होतो… मंत्र्यांनी सही केली की… कुठल्याही कामाला मंजुरी मिळते…त्यामुळे सहीचा अधिकार खुप आहे. सहीचा अधिकार १३ वर्ष होता आणि काहीच करता आलं नाही असं म्हणतात आता काय बोलणार यांना…असा टोलाही त्यांनी लगावला.
यांना राज्यमंत्री केलं गृह खात्याचा…जाईल तिथे पोलिसांचा सॅल्युट… मंत्रीमंडळात वनखातं हे महत्वाचं वनखातं असतं… मी स्वतः वनमंत्री होतो. मुख्यमंत्री असताना गृह खाते कमी केलं आणि वनखातं घेतलं. महाराष्ट्रात वनसंपत्ती वाढवल्याशिवाय पावसाचा, पाण्याचा आणि बाकीचा जो प्रश्न आहे, तो सुटणार नाही. म्हणुन मी स्वतः ते काम केल्याचे त्यांनी सांगितले.
गडयाचं लक्षण ठिक नव्हतं त्याची काय दुसरीच काळजी सुरु होती. त्या खोलात जात नाही असा टोला लगावला…
कारखाने दोन काढा किंवा तीन काढा. नाहीतर काही करा, परंतु इथल्या कामगाराचे पैसे आणि शेतकर्यांचं देणं द्या..ज्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांनी आपला ऊस घालून वर्ष दोन वर्ष पैसे थकवले तर ती गोष्ट योग्य नाही. त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मेहनत करुन घाम गाळलेली पगाराची रक्कम त्याला मिळत नसेल… तर त्याची चुलही पेटत नाही. जो माणुस कष्ट करणार्या कामगाराची चुल न पेटवण्याचे काम जो माणूस करतो त्याला गरिबांचा तळतळाट लागतो आणि हा तळतळाट असला की त्याला यश घेता येत नसल्याचे ते म्हणाले.
मी दिल्लीहून मुंबईला आलो होतो. महाराष्ट्राची विधानसभा सुरु होती. दुसर्या दिवशी माझ्या वाचनात आले की, आज जे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा ते विरोधी पक्षात होते. त्याचं भाषण आलं होतं छापून त्यांनी कुणाची तरी कागदपत्रे आणून विधानसभेत ठेवले. आणि त्यांनी सांगितले की असल्या दरोडेखोर माणसाला सत्तेतून काढलं पाहिजे. याबाबत चौकशी केली. कोण मंत्री आहे तर आपला शेजारीच आहे. आपल्या शेजार्याने एवढा चमत्कार करावा. लोकांनी त्यांना दरोडेखोर बोलावं. आणि ज्यांनी म्हटलं ते आज मुख्यमंत्री झाले आहेत. ते आज त्याचं कौतुक करत आहेत. मला एवढंच सांगायचंय मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेब हे वागणं बरं नव्हं…असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
भ्रष्टाचाराची प्रकरणे आजच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली होती. अशांना तुम्ही संधी देता… अशांना जवळ करता… भले तुम्ही किती प्रामाणिक असला तरी तुमची संगत रोज महाराष्ट्राला सांगत असते की, कसल्या प्रवृत्तीचे लोकं तुम्ही उभे करत आहात असा सवालही त्यांनी केला.
सत्तेचा गैरवापर रयत संस्थेत कुणी केला नाही. कुणी राजकारण केलं नाही… हे पथ्य कोण पाळत नसेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची शक्ती आहे. जसं बसवलं तसं आणखीन काही करण्याचा विचार होवू शकतो. त्यामुळे अजुनही दुरुस्त व्हा… या शैक्षणिक संस्थेचं मांगल्य घालवू नका असा इशाराही त्यांनी दिला.
Marathi e-Batmya