शरद पवार यांचा उपरोधिक टोला, खरतरं त्यांनी ५४३ आकडा सांगायला हवा होता

लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यात काहीही फरक नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अकलूजमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

शरद पवार म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येथे येतील आणि पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख १६ एप्रिल आहे. सोलापुरात दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील असे शरद पवार यांनी सांगितले. याचबरोबर शिवसेनेचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील येत्या २६ एप्रिल रोजी पक्षात प्रवेश करणार आहेत असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपानं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत. त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ देऊ नका असं ते म्हणतात. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जसा तसाच विरोधी पक्षही महत्वाचा असतो. एकही माणूस निवडून येऊ देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यात काही फरक नाही अशी खोचक टीकाही यावेळी केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर जिल्हा हा पुरोगामी गांधी, नेहरू यांच्या विचारांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. या जिल्ह्याचा इतिहास बघितला तर येथील महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील पाटील हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची खात्री आहे असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

भाजपाने अबकी बार ४०० पार या घोषणेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी सवाल केल्यावर शरद पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. चार जागा राष्ट्रवादीला, एक जागा काँग्रेसला आणि एक जागा एमआयएमला मिळाली होती. हे पाच सहा जागांचे चित्र यंदा कितीतरी पटीने वाढलेले असणार आहे. तसे भाजपाने ५४३ चा आकडा सांगणे योग्य होईल असे सांगत भाजपाला उपरोधिक टोलाही लगावला.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *