संजय राऊत यांना समन्स, हाजीर हो

पत्राचाळ प्रकरणी नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अलीकडेच जामीन मिळाला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा राजकियदृष्ट्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावले असून १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयात हजर न झाल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बेळगाव न्यायालयाने समन्स दिल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलतना संजय राऊत म्हणाले, बेळगाव येथील न्यायालयात बोलावून मला अटक करण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतची माहिती माझ्या कानावर आली आहे असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. २०१८ साली केलेल्या भाषणात आक्षेपार्ह काय होतं, तेच कळलं नाही, असेही ते म्हणाले.

कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील. माझ्या भाषणात प्रक्षोभक काय होत? तेच कळलं नाही. पण २०१८ साली केलेल्या भाषणाची आता दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ असा की, मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल, ही माझी माहिती आहे. बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावं, अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीचा भाग तोडून कर्नाटकाला जोडण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी या विषयाला तोंड फोडलं. पण महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आम्ही लढा देत आहोत. त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींमध्ये गुंतवणे, बेळगावात बोलवून हल्ले करणे, असं कारस्थान शिजताना मला दिसतंय. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी. शिवसेनेनं सीमाप्रश्नासाठी ६९ हुतात्मे दिले आहेत. मी ७० वा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेबांनीही सीमा प्रश्नासाठी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगला असल्याचेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *