राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, या लोकांना समुदेशनाची गरज भाजपा पुरस्कृत अयोध्या दौऱ्यावर गुन्हे दाखल कोण करणार

अयोध्या दौऱ्याला तुर्त स्थगिती देण्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्यासंदर्भातील विस्तृत भूमिका मांडण्यासाठी आज पुणे येथील गणेश कला क्रिडा मंचच्या सभागृहात मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याबाबत एक चकार शब्द न काढता उलट शिवसेना, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांना अडकवण्यासाठी हा सापळा रचला असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर पलटवार चांगलेच प्रत्युत्तर दिले. यावेळी प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, हे कधी झाले हिंदूत्व वादी? असा सवाल करत यांनी हिंदूत्वाची शाल कधी पांघरली याचा खुलासा करावा अशी खोचक मागणीही केली.
शिवसेनेवर त्यांनी बोलू नये आणि बाळासाहेबांची क्रेडिबलिटी काय आहे हे महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. त्यांनी स्वतःच्या पक्षाविषयी बोलावे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ५० वर्षापासून काम करत आहे. संभाजीनगर हे नाव आम्ही केलेलंच आहे म्हणूनच राज ठाकरे बोलत आहेत. त्यांनी जो संभाजीनगर हा उच्चार केला आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच केला आहे. बाळासाहेबांनी त्याचवेळी सांगितले की हे संभाजीनगर आहे आणि आता कागदोपत्री व्हायचं आहे. याबाबत केंद्राकडे प्रस्ताव आहे ते तो मंजुर करतील असा पलटवार राऊत यांनी राज ठाकरेंवर केला.
हे कधी झाले हिंदुत्ववादी? आमच्या हिंदुत्वाला ढोंगी म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली त्याचा खुलासा करावा. आमचे हिंदुत्व प्रखर, राष्ट्रवादी हिंदुत्व आहे. अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे? राज ठाकरेंच्या अयोध्ये दरम्यान उत्तर प्रदेशात कोण गुन्हे दाखल करणार? भाजपापुरस्कृत दौऱ्यावर कोण गुन्हे दाखल करणार? हे वैफल्य आहे आणि या लोकांना समुपदेशनाची गरज असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सोयीनुसार त्यांनी हिंदुत्व घेतले आहे. इतर कोणत्याही विषयांची दुकाने चालली नाहीत तेव्हा हिंदुत्व चालवून बघावं म्हणून ते बोलत आहेत. पण अयोध्या, राममंदिर यासंदर्भात भूमिका घेताना आपला इतिहास त्यांनी तपासून पाहावा असा टोला लगावत मातोश्रीने तुम्हालाही मोठं केलं आहे असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
राणा दाम्पत्यासोबत लडाखमध्ये एकत्र जेवण केल्याबाबत राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हे केंद्र सरकारला विचारा कारण ती त्यांची समिती होती. ती खाजगी टूर नव्हती. केद्रीय बैठकीसाठी आम्ही गेलो होतो. एवढंही यांना समजत नसेल तर या लोकांनी राजकारणात राहू नये असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *