मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाप्रमाणे राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. मात्र अद्याप शिवसेनेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावतीने गुरूवारी राज्यपालांची भेट घेवून सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यातील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. याबैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उद्या गुरूवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी सुधीर मुनगंटीवार भेट घेणार आहोत. त्यावेळी सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगत राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीचा कालवधी पूर्ण होत आल्याने नवा प्रदेशाध्यक्ष निवडणूकीची प्रक्रिया सुरु होत आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आता आम्ही प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव झालेला नसला तरी त्यांची वाट पाहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Marathi e-Batmya