मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, वारसा सांगणारेच अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले असून या राजकिय रणनीतीचा भाग म्हणून महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजी नगर येथे पहिलीच व्रजमुठ सभेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट) हे पक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली असून ठाण्यातही ही यात्रा काढण्यात आली. यावेळी सावरकर गौरव यात्रेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सहभागी झाले होते. या यात्रेच्या समारोपावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे लोक आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला, त्यांच्यासोबत बसण्याचं पाप काही लोक करत आहेत, हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. परंतु आम्ही मात्र सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही. या सरकारमधली कोणतीही व्यक्ती ते खपवून घेणार नाही असा इशाराही दिला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. सावरकर हे देशभक्त होते, राष्ट्रभक्त होते, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पूर्वी लोक हिंदुत्व हा शब्द उच्चारायला कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मान सन्मान जागा झाला.

जाणीवपूर्वक हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताना पुढे म्हणाले की. सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातला हिंदू आता जागा झाला आहे, जागरुक झाला आहे आणि तो आता सक्रीय झाला आहे. पण काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्याना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *