गत महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना घरी बोलावत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. तसेच बच्चू कडू यांचा योग्य तो सन्मान राखला असे असतानाही शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री पदाची पर्वा न करता एकनाथ शिंदे यांची साथ धरली आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मतदानही केले. आणि आता तर बच्चू कडू यांची प्रहार संघटनाच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विलीन केली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली.
याबाबत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिक होता. घरी बोलावून मंत्री केला ही माझी चूकच होता. लोभापायी गेले जे गेले त्यांना जाऊ द्या, लढणारे कार्यकर्त्ये माझ्याबरोबर आहेत. याचा मला आनंद असल्याचे सांगितले. यावेळी प्रहार जनशक्तीचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे यांनी मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 22, 2026
यापूर्वी सामना वर्तमान पत्रातून मंत्री बच्चू कडू यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. अमरावती विभागात बराच काळ आमदार आणि मंत्री असलेले बच्चू कडू यांनी स्वतःला मिंधे गटात करून जीवंत समाधी घेतली असे टीकास्त्रही सोडले.
दरम्यान, बच्चू कडू यांनी झेंडा हातात असला तरी अजेंडा बदलणार नाही असे वक्तव्य शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूमिका स्पष्ट केली होती. तर एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना बच्चू कडू हिंदू असल्याचा गर्व नक्की आहे. पण वाद होता कामा नये. माझ्या मुद्यावर कायम राहणार असल्याचे सांगत लोकभावना तशी असती तर मला तसा निर्णय घेण्याची गरजच पडली नसती असेही सांगितले.
Marathi e-Batmya