मुंबई मराठी माणसांची राजधानी आहे. त्यामुळे मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही, तर काय गुजरात किंवा गुवाहाटीला जाणारा का? असा सवाल शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेणारे गावी जाऊन बसले असा टोला एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला.
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सेवानिवृत्त न्यायाधीश बी.सुदर्शन रेड्डी यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या सरकारने सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच न्याय देण्याचा शब्द दिला होता. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी तर या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ ही घेतली होती. मग आरक्षण देण्याची ग्वाही देणारे गावी पळाले का? आता नुसती दर्शने घेत आहेत. एवढी जनता जनार्दन मुंबईत आल्यावर त्यांना सामोरे जा. नुसतं घरोघरी काय फिरता, अशी खरमरीत टीका ही यावेळी केली.
मराठा समाजबांधवांच्या आरक्षणाबाबत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेला संवाद. pic.twitter.com/atAhr9LEde
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 29, 2025
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत या लोकांना वापरून फेकून देण्यात आले. मराठी माणसं मुंबईत दंगल करण्यासाठी नाही तर आपल्या हक्कासाठी आली आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने संवाद साधून त्यांचा न्याय हक्क दिला पाहिजे असेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी तरी आंदोलन चालवत आहे, असा आरोप केला त्यावर बोलताना उद्धव ठाकरे शेवटी म्हणाले की, त्यांनीच कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन चालवत आहे हे सांगावे. जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देण्याची वेळ सरकारने का येवून दिली. मी या प्रकरणी काही बोललॊ तर माझ्या हातात काहीच नाही. तुम्ही दहा जणांच्या भूमिका विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे असा सल्लाही यावेळी राज्य सरकारला दिला.
Marathi e-Batmya