विजय वडेट्टीवार यांचा आरोप, परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आज केला.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, परिवहन विभागातील निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार असून, वसुलीसाठी त्यांनी समांतर यंत्रणा उभी केली असून, राज्यात १०० रुपये वसुली झाली तर ९० रुपये स्वतः घेतात, असा धक्कादायक आरोप केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर झालेली एसीबीची झालेलीची कारवाई हा एक पूर्वनियोजित कट आहे. तक्रारदाराने घेतलेला लांबचा प्रवास आणि टोल रेकॉर्डमधील तफावत हे सिद्ध करते की, हे प्रकरण केवळ पोटदुखे यांना अडकवण्यासाठी रचले गेले आहे.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भातील ६४ जण आरटीओमध्ये रुजू झाली आहेत, मात्र या नियुक्त्या खैरनार आणि भुयार यांच्या मर्जीने न झाल्याने आता हे अधिकारी त्यांच्या पदोन्नतीत अडथळे आणत आहेत. जे अधिकारी वसुलीला नकार देतात, त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवण्याची किंवा बदली करण्याची धमकी दिली जात आहे, याप्रकरणी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री या पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली.

अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासाचा झालेला गैरवापर यावर बोट ठेवत विजय वडेट्टीवार म्हणाले की, काही लोक तंत्र-मंत्राचा वापर करून खुर्ची टिकवण्याचे किंवा इतरांना हटवण्याचे प्रयत्न करत आहेत. हे कृत्य संविधानाची शपथ घेणाऱ्यांना शोभा देणारे नाही. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयात एसीबी ट्रॅप लावून पकडण्यात आले तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली नाही आता त्यांनी शासकीय निवासस्थानाचा गैरवापर केला आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुणे जमीन घोटाळा असो वा आरटीओमधील वसुली, सरकार केवळ लहान माशांवर कारवाई करून मोठ्या माशांना वाचवत आहे. सध्याच्या सरकारमध्ये अंतर्गत गँगवॉर सुरू असून मंत्री एकमेकांविरुद्ध कट रचत आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत असल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *