गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार

काही दिवसांपूर्वी अमेरिकत गर्भपातासंदर्भात वेगळा निर्णय दिला होता. त्यानंतर जगभरतील अनेक देशांमध्ये याबाबतचा प्रश्न उपस्थित झाला. याच अनुषंगाने भारतातही यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत एक याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित गर्भपाताचा अधिकार विवाहीत असो किंवा अविवाहीत असो त्या सर्व महिलांना असल्याचा महत्वपूर्व निकाल दिला.

एका २५ वर्षीय तरुणीने संमतीच्या संबंधातून राहिलेल्या २३ आठवडे आणि पाच दिवसाच्या गर्भाचा गर्भपात करण्याची परवानगी मिळावी यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली. या तरुणीच्या जोडीदाराने लग्नास नकार दिला होता आणि ती अविवाहित असताना मुलाला जन्म देऊ इच्छित नव्हती. या याचिकेची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने गर्भपात कायद्यात अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार नाही, असं निरिक्षण नोंदवत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर या तरुणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि जे. डी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने अविवाहीत महिलांना गर्भपाताच्या अधिकारापासून दूर ठेवणं असंवैधानिक असल्याचेही स्पष्ट केले.

याप्रकरणी सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा सर्व महिलांना अधिकार आहे. गर्भपाताच्या कायद्यात २०२१ ला केलेल्या तरतुदीत विवाहित आणि अविवाहित महिला असा फरक केलेला नाही. जर या कायद्यातील ३ ब (क) ही तरतूद केवळ विवाहित महिलांसाठी असेल, तर त्यामुळे केवळ विवाहित महिलांना लैंगिक संबंधांचा अधिकार आहे असा पूर्वग्रह होईल. हे मत संवैधानिक कसोटीवर टिकणार नाही.
महिलांना गर्भपाताचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. पुनरुत्पादनाचा अधिकार विवाहित महिलांसह अविवाहित महिलांनाही आहे. एमटीपी कायदा २०-२४ आठवड्यांचा गर्भ असलेल्या महिलांना गर्भपाताचा अधिकार देतो. मात्र, हा अधिकार केवळ विवाहित महिलांना दिला आणि अविवाहित महिलांना यापासून दूर ठेवलं तर संविधानाच्या कलम १४ चा भंग होईल, असेही न्यायालयाने नमूद केले.

गर्भाचं अस्तित्व महिलेच्या शरिरावर अवलंबून असतो. त्यामुळे गर्भपाताचा अधिकार महिलांच्या शरीर स्वातंत्र्याचा भाग आहे. जर सरकार एखाद्या महिलेला इच्छा नसताना गर्भ ठेवण्याची सक्ती करत असेल तर ते महिलेच्या सन्मानाला धक्का पोहचवणारं ठरेल, असे महत्त्वाचे निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले.

About Editor

Check Also

पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही आसामधील न्यायालयाकडे दाद मागण्याचे दिले आदेश

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे अनेक पासपोर्ट आणि परदेशी मालमत्ता असल्याच्या काँग्रेस प्रवक्ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *