कोरोनाने घालवली सत्ताधारी आणि विरोधकांची एक संधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या संकेत आणि प्रथा पहिल्यांदाच मोडित

मुंबई: विशेष प्रतिनिधी

देशात सांसदीय कार्यप्रणालीनुसार कामकाज चालत असल्याने पावसाळी, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काही गोष्टींचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात येते. त्या गोष्टींना हजेरी लावायचे कि नाही याचा निर्णय राजकिय विरोधकांनी घेण्याचे स्वातंत्र्यही आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच कोरोनामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ना कोणती राजकिय गरमागरमी ना कोणत्या प्रथा आणि संकेताचे पालन अशी परिस्थिती राजकिय पक्षाच्या नेत्यांना अनुभवावी लागत असल्याने पावसाळी अधिवेशन उद्या ७ सप्टेंबर सोमवारपासून असूनही राजकिय माहोल शांतच असल्याचे दिसून येत आहे ते केवळ कोरोनामुळे. तसेच यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांची एक संधी गेल्याचे दिसून येत आहे.

राज्यात हिवाळी, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपल्याकडे राज्य सरकारकडून विरोधकांशी सौहार्दाचे संबध रहावेत यासाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार चहापानाला विरोधकांकडून उपस्थिती लावली जाते असे कधीतरी. मात्र गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ सरकारकडून प्रथेचा भाग म्हणून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि दरवेळी विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घातला जातो. भले विरोधक सत्तास्थानी असोत किंवा सत्तास्थानावरचे विरोधात असो प्रत्येकवेळी भूमिका बदलल्या तरी विरोधकांचा चहापानावरील बहिष्कार कायम राहीला आहे.

परंतु यंदा पहिल्यादाच कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर यापूर्वीच बंदी आलेली आहे. तसेच ५० लोकांपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांकडून आयोजित बैठक आणि बैठकीनंतर होणारी पत्रकार परिषद यंदा आयोजित झालीच नाही, कि अधिवेशनात काय भूमिका मांडणार याची घोषणा नाही. त्यातच राज्य सरकारकडूनही यंदा पहिल्यांदाच चहापानाचा कार्यक्रम कोणतीही घोषणा न करता सरळ रद्द करण्यात आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाला आमंत्रित करायचं आणि विरोधकांनी राज्यातल्या जनतेच्या प्रश्नावर बहिष्कार घालण्याची घोषणा करायची हे नेहमीच चित्र यंदा पाह्यला मिळत नाही.

तसेच चहापानानंतर राज्य सरकारकडूनही विरोधकांचे मोजमाप काढत त्यांच्यापेक्षा आम्ही किती चांगले काम करत आहोत हे सांगण्याची संधी सरकारचीही गेली.

कोरोना विषाणूमुळे मानवी जगण्यावर निर्बंध आलेत. तसेच त्याच्या आकांक्षाला किंवा त्याच्या जगण्यातील सवयी आणि दैनदिन गोष्टींमध्येही बदल करण्यास भाग पाडले आहे. त्यातून देशातील सांसदिय लोकशाही प्रणालीही कशी सुटू शकेल. या विषाणूमुळे राजकिय प्रथा आणि परंपरा आणि संकेतातही बदल झाले हे मान्य करावेच लागेल. परंतु एकमात्र झाले की यानिमित्ताने विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याचे आणि विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर देत त्यांच्यावर कडी करण्याची या दोघांची संधी गेली.

About Editor

Check Also

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास भारत सरकार करतयं टॅरिफप्रकरणी निकाल पुढे आल्यानंतर नवा टॅरिफ लागू

भारत सरकारने शनिवारी सांगितले की ते अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफवरील अलिकडच्या निकालाचे आणि त्यानंतरच्या पावलांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *