मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी पद स्विकारल्यापासून केलेल्या कामाचा आढावा पुस्तक स्वरूपात “जनराज्यपाल ” नावाने प्रकाशित केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना खोचक पत्र लिहिले. त्यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्राने अनुभवत असतानाच भविष्यात पवार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या राज्यपाल पदाची सूत्र हाती घेण्याला वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्त राज्यपाल पदाच्या वर्षभराच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती दर्शवणारे “जनराज्यपाल” असे कॉफी टेबल बुक राजभवन सचिवल्याने प्रकाशित केले. त्याची एक प्रत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पाठविण्यात आली होती. सदर पुस्तकाचे अवलोकन केले असता,भारतीय संविधानात “जनराज्यपाल” असा नामोल्लेख आढळत नसल्याचे निदर्शनास आणून देत आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर स्वप्रसिद्ध कॉफीटेबल बुक मिळाल्याचे आपल्या खोचक शब्दात सांगत राज्यपालांचे आभार मानले. शिवाय यामध्ये एखाद दुसरा वगळता शपथविधी,स्वागत समारंभ,दीक्षांत समारंभ यासारखे सोहळे,उच्च स्पदांच्या गाठीभेटी,इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची छायाचित्र या पुस्तकात पहायला मिळाल्याचे पवारांनी आपल्या पत्रात नमूद केले.
मात्र निधर्मवादासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद ह्या माहिती पुस्तकात दिसून आली नसल्याचा खोचक टोला पवार यांनी पत्रातून लगावला. त्यामुळे आगामी काळात राज्यपाल कोश्यारी विरूध्द शरद पवार असा संघर्ष पहायला मिळाल्यास आर्श्चय न लगे.

Marathi e-Batmya