विक्रम काळेंनी मला फोन करुन सांगितलं की आम्हाला १५ मिनिटं द्या. आम्हाला जी पुस्तकं वाटायची आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात करुन फक्त जा. मी घड्याळ बघतोय. विक्रम काळे हे शिक्षकांचे प्रतिनिधीचं गणित इतकं कच्चं असेल याचं उदाहरण आता पाहायला मिळालं. १५ मिनिटं झाली आणि आपण जवळपास एक तासावर आलाय असा मिश्किल चिमटा काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भाषणाला सुरुवात करताच सभागृहामध्ये हशा पिकला.
औरंगाबाद शहरामध्ये आज एकता आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली. एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी भवन सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच् अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुस्तक वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विभागातील आठ जिल्ह्यातील ३३०० शाळांना दहा कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके ग्रंथालयांसाठी भेट देण्याची मोहीम राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांच्या हस्ते सुरु करण्यात आली.
वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंताची पुस्तकं आहेत. यातून वाचन संस्कृती वाढवी हे डोक्यात ठेऊन विधीमंडळाच्या सदस्याचा जो काही निधी असतो. त्याचा योग्य वापर करण्याचा आदर्श कार्यक्रम विक्रम काळेंनी हाती घेतला आणि त्याची आता सुरुवात होतेय/ खासदाराला जे काही मिळतं आणि आमदाराची तुलना केली तर महाराष्ट्रातील लोकप्रितिनिधांना लोकांसाठी काम करता यावं म्हणून अर्थमंत्र्यांकडून एवढी मोठी रक्कम राज्यातील लोकप्रितिनिधींना दिली जाते असल्याचे त्यांनी सांगितले.
पुस्तक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप करणं सोप्पी गोष्ट नाही. आजच्या कार्यक्रमात येण्यापूर्वी काळजी वाटत होती असे सांगत शरद पवार पुढे म्हणाले की, मी एकदा शिक्षण मंत्री होतो. शिक्षणमंत्री म्हणून काही वर्ष महाराष्ट्रात काम केलं. पण त्या इतकं अवघड काम दुसरं नाहीय. त्याचं कारण शिक्षकांच्या संघटना आणि त्यांचे नेते मिळून शिक्षण मंत्र्यांना सांगत असतात, हे हे करा, त्या त्या पद्धतीनं करा, हा निर्णय असा घ्या, तो निर्णय तसा घ्या. त्यानंतर मी विचार केला की हा निर्णय जर घेतला तर राज्यातील एकंदर शिक्षक किती, शिक्षण क्षेत्रातील सहभागी किती, आर्थिक बाजू किती बरी आहे. हे सर्व पाहता एवढा बोजा माझ्या खात्याच्या बजेटमध्ये शक्य नाही हे ध्यानात आल्यानंतर शिक्षक संघटनेचे नेते प्रश्न मांडत असतात पण मंत्र्याला त्यावर हो की नाही बोलताना येत नाही अशी अडचण त्यांनी बोलून दाखवली.
मंत्री हो की नाही बोलत नाही बघितल्यावर शिक्षक संघटनेच्या लोकांना वाटतं की हा मंत्री आपल्या वर्गातला कच्चा विद्यार्थी आहे त्याला अजून त्याला समजलेलं नाही समजून पुन्हा पुन्हा ते समजून सांगण्याचं काम त्या संघटनेचे लोक करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ बदललं वसंतराव नाईक गेले. शंकरराव चव्हाण आले. शंकरराव चव्हाणांना मी सांगितलं की तुम्ही मला (मंत्रीमंडळामध्ये) घेणार असाल तर मला शिक्षण खात्यातनं काढा आणि मला शेती खातं किंवा असं काहीतरी द्या. त्यांनी मला शेती खातं दिलं आणि माझ्या दृष्टीनं माझी सुटका केली असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आपलं भाषण संपवताना शरद पवार यांनी त्यांचे पुतणे आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आलेल्या मागण्यांवरुन मजेशीर भाष्य केलं. “मी अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो. नंतर विक्रम काळेंचं भाषण ऐकलं. त्यांनी आधी सांगितलं की काही नाही फक्त १५ मिनिटांचा कार्यक्रम आहे फक्त पुस्तकं वाटून जायचं. पण त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी इतक्या मागण्या केल्यात की माझी खात्री आहे, की अर्थमंत्र्यांची झोप आज काही चांगली लागणार नाही असा चिमटाही त्यांनी अजित पवारांना काढला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम होते तर, यावेळी मंत्री अजित पवार, राजेश टोपे, धनंजय मुंडे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, माजी आमदार अमरसिंह पंडीत, डॉ. कल्याण काळे, कैलास पाटील यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन (मुप्टा) चे सहावे रौप्य महोत्सवी अधिवेशन तापडिया मैदानावर दुपारी होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबतच कॅबिनेटमधील मंत्री असणारे राजेश टोपे, धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खासदार फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंह पंडित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
Marathi e-Batmya