राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील उपनेतेपदावरून हटवले होते. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, राघव चड्ढा यांनी आपल्यावरील तीन प्रमुख आरोपांना उत्तर दिले. खोट्या दाव्यांना काही प्रमाणात विश्वासार्हता मिळण्यापूर्वीच आपल्याला बोलावे लागले, असे ते म्हणाले.
शुक्रवारी ‘आप’ने आरोप केला होता की, हे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यास घाबरत आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील ठरावाला पाठिंबा देण्यात अपयशी ठरले आहेत आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर जोर देण्याऐवजी समोशांवर चर्चा करण्यात आपला संसदीय वेळ वाया घालवला आहे.
“गेल्या काही वर्षांपासून तुम्ही घाबरू लागला आहात, राघव चड्ढा. तुम्ही मोदींच्या विरोधात बोलण्यास घाबरता. तुम्ही देशाचे खरे प्रश्न मांडण्यास घाबरता,” असे ‘आप’चे राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनुराग धांडा म्हणाले.
आपल्या व्हिडिओ संदेशात, राघव चड्ढा यांनी आपल्या विरोधात एक “नियोजित मोहीम” चालवल्याचा आरोप केला. “तेच प्रश्न आणि तेच आरोप माझ्यावर. हा योगायोग नाही, तर एक सुनियोजित हल्ला आहे,” असा आरोप राघव चड्ढा यांनी व्हिडिओमध्ये केला.
सभात्यागाच्या वेळी त्यांनी विरोधी पक्षाला कधीही पाठिंबा दिला नाही, या आरोपावर राघव चड्ढा यांनी पक्षाला आव्हान दिले की, त्यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा न दिल्याचा किमान एक प्रसंग तरी दाखवावा.
“हे निव्वळ खोटं आहे. संसदेत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. उत्तर मिळवण्यासाठी कोणीही ते तपासू शकतो,” असे ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी न केल्याचा आरोपही चड्ढा यांच्यावर केला होता. यावर उत्तर देताना, पंजाबचे खासदार म्हणाले की, किमान ६-७ ‘आप’च्या खासदारांनीही या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती.
“आपचे १० राज्यसभा खासदार आहेत. पण याचिकेवर स्वाक्षरी न केल्याबद्दल मलाच का दोष दिला जात आहे?” असा प्रश्न सवालही राघव चड्ढा यांनी विचारला.
सत्ताधारी भाजपाच्या भीतीने ते क्षुल्लक मुद्दे उपस्थित करत असल्याच्या ‘आप’च्या आरोपाचे जोरदार खंडन करत राघव चड्ढा म्हणाले, “मी राज्यसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलो आहे. मी इथे गोंधळ घालण्यासाठी आलेलो नाही. मी इथे प्रभाव पाडण्यासाठी आलो आहे.”
शिवाय, त्यांनी दिल्लीतील वाढते प्रदूषण, सरकारी शाळांची दयनीय अवस्था, पंजाबशी संबंधित अनेक समस्या तसेच रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केलेल्या चिंता यांसारख्या अनेक लोककेंद्रित मुद्द्यांवर आपले मत मांडले.
‘घायल हूँ, इसलिये घातक हूँ (मी दुखावलो आहे, म्हणूनच मी धोकादायक आहे),’ असे म्हणत त्यांनी ‘धुरंधर’ या बॉलिवूड स्पाय-थ्रिलरमधील संवादाने आपला व्हिडिओ स्टेटमेंट संपवला.
पक्षाने गुरुवारी राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी ‘आप’चे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती केली.
पक्षाच्या महत्त्वाच्या बाबींवर चड्ढा यांचे मौन, विशेषतः उत्पादन शुल्क धोरण सीबीआय प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.
Marathi e-Batmya