लेखक भगवान यांचे मोठे विधान, राम आणि सीता दिवसभर मद्य प्यायचे शंभूकाचा वध करणारा राम आदर्श कसा असेल?

२०१४ पासून देशात हिंदूत्वाचा नारा बुलंद होत आहे. त्यातच अयोध्येतील रामाच्या जन्मभूमीप्रकरणी अर्थात बाबरी मस्जिद प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडून हेतूपुरस्सर वाल्मिकी रामायणातील राम-सीतेचा जयघोष करत हिंदू धर्मियांच्या भावनेला हात घालत हिंदूधर्मियांची व्होट बँक बळकट करत राजकिय स्थान पक्के केले. मात्र भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ज्या राम-सीतेचा देव म्हणून गौरव करण्यात येत आहे, त्या राम-सीतेबाबत प्रसिध्द लेखक के.एस.भगवान यांनी वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडचा संदर्भ देत श्रीराम आणि सीता हे दिवसभर मद्य प्यायचे असे वक्तव्य केले.

विशेष म्हणजे लेखक भगवान यांनी हे विधान कर्नाटकातील बंगळुरू येथील एका कार्यक्रमात केले. त्यामुळे भगवान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी काळात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

निवृत्त प्राध्यापक आणि प्रसिद्ध लेखक के. एस. भगवान यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान यासंदर्भात विधान केले. या कार्यक्रमात बोलताना के.एस.भगवान म्हणाले, सध्या लोक चर्चा करतायत की रामराज्य निर्माण व्हावं. पण जर तुम्ही वाल्मिकी रामायणामधील उत्तरकांड वाचलं तर लक्षात येईल की भगवान राम हे आदर्श नव्हते. त्यांनी ११ हजार वर्षं राज्य केलं नव्हतं. त्यांनी फक्त ११ वर्षे राज्य केले होते, असा दावा केला.

भगवान राम दुपारच्या वेळी सीतेसमवेत बसायचे आणि उरलेला पूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे. त्यांनी त्यांची पत्नी सीतेला अरण्यात पाठवलं. तिच्याबद्दल कोणताही विचार त्यांनी केला नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या शूद्र व्यक्तीचं मुंडकं धडावेगळं केले होते. त्यामुळे ते आदर्श कसे असू शकतील? असा सवालही भगवान यांनी उपस्थित केला.

भगवान यांनी चार वर्षांपूर्वीही अशाच प्रकारचं केलेलं विधान चर्चेत आलं होते. त्यावेळीही त्यांनी वाल्मिकी रामायणमधील उत्तरकांडातील भागांचा संदर्भ दिला होता. मात्र, वाल्मिकी रामायणाचा उत्तरकांड हा शेवटचा भाग वाल्मिकींनी लिहिलाच नव्हता, तो नंतर त्यात समाविष्ट करण्यात आला, असा दावा त्यावर काही जणांकडून केला जातो.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी यांची केरळ मध्ये डाव्या आघाडीवर टीका, भाजपाच विजयी होणार पालक्काड येथील जाहिर सभेत केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ मार्च, २०२६) केरळच्या पालक्काड येथे एका सभेत सांगितले, “केरळमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *