निवडणूक प्रचाराच्या दरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लिट्टेच्या आत्मघातकी पथकाने बॉम्बस्फोट घडवून आणत जीवे मारले. त्यावेळी राजीव गांधी यांच्या मृतदेहाचे इतक्या चिंधड्या उडाल्या होत्या की, त्यांच्या शरीराचे अवयव शोधावे लागले होते. या कटातील एक आरोपी ए जी पेरारिवलन यास आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने सोडून देण्याचा निकाल दिला. त्यामुळे ३१ वर्षानंतर पेरारिवलन हा तुरुंगातून बाहेर येणार आहे.
सुटकेची मागणी करणाऱ्या पेरारिवलन याच्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली होती, निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. आज यावर निकाल देतांना पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश दिले.
१९ वर्षांचा असतांना पेरारिवलन याला ११ जून १९९१ मध्ये अटक करण्यात आली होती. लिट्टे म्हणजेच लिबरेशन ऑफ तामीळ इलम या संघटनेच्या शिवरासन याला ९ वोल्टची बॅटरी दिल्याचा आरोप पेरारिवलनवर होता. राजीव गांधी यांच्या हत्येचा कट प्रत्यक्ष अंमलात आणण्यात शिवरासन याची प्रमुख भुमिका होती. २१ मे ला राजीव गांधी यांच्या हत्येसाठी मानवी बॉम्बचा वापर करण्यात आला होता, त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरी या पेरारिवलनने पुरवल्या होत्या. १९९८ ला टाडा कोर्टोने पेरारिवलला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तर २०१४ मध्ये या शिक्षेत बदल करत सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलनला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर हा सुटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. २००८ मध्ये पेरारिवलन याची सुटका करावी असा ठरावच २००८ मध्ये तामिळनाडू मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. हा ठराव राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता. तेव्हापासून राष्ट्रपतींकडे हे प्रकरण प्रलंबित होते. राज्यपालांकडून निर्णय न आल्याने राष्ट्रपतींकडे पेरारिवलन धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद १४२ च्या आधारावर पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.
Marathi e-Batmya