राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला २८ जून २०२५ रोजीचे ५.३० पासून ते ३० जून २०२५ रोजी ११.३० पर्यंत ३.४ ते ४.९ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रायगड जिल्ह्यात २०.८ मिमी पाऊस झाला आहे. तर पालघर जिल्ह्यात २०.७, सिंधुदुर्ग १३.५, ठाणे जिल्ह्यात १३.४ मिमी, आणि रत्नागिरी जिल्ह्यात १२ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज २९ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १३.४, रायगड २०.८, रत्नागिरी १२, सिंधुदुर्ग १३.५, पालघर २०.७, नाशिक ५.५, धुळे ५.१, नंदुरबार ८.१, जळगाव २.९, अहिल्यानगर ०.४, पुणे ५, सातारा ५.५, सांगली ४.५, कोल्हापूर ११.५, छत्रपती संभाजीनगर ०.७, जालना ०.६, नांदेड ०.२, परभणी ०.१, हिंगोली १.२, बुलढाणा २.३, अकोला ४, वाशिम ४.९, अमरावती २.३, यवतमाळ १.९, वर्धा २.५, नागपूर ६.८, बुलढाणा ७.३, गोंदिया १७.६, चंद्रपूर ३.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाली आहे. तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मौजा वह्या कुहा येथील एक शेतकरी पेरणी करत असताना ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
Marathi e-Batmya