भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविणार मुख्यमंत्र्याशी चर्चा करून धोरण तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांच्या चाव्याने झालेल्या रेबीजच्या रूग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन धोरण तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.

पालघर येथील दहा वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

पालघर येथील या मुलास त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नेण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरला निलंबित केले आहे. त्याचबरोबर १०८ क्रमांकासाठी सेवा पुरवठादार म्हणून काम करणाऱ्या कंपनीवर देखील चौकशी अंती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील बनला आहे. यावर अशा कुत्र्यांची नसबंदी करणे हा प्रतिबंधात्मक उपाय असला तरी पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. पिसाळलेला कुत्रा चावला किंवा त्याचा नख जरी लागला तरी रेबीज होतो. त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची भयानकता पाहून लसीकरण मोहिम हाती घेणे आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *