अयोध्येच्या दौऱ्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत घेतलेल्या भूमिकेवरून एकाबाजूला सर्वच स्तरातून हिणवण्याचा प्रकार सुरू झालेला असतानाच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र राज ठाकरे यांच्या भाषणाचे आणि भूमिकेचे कौतुक केले. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या भाषणाकडे राजकिय प्रगल्भतेने पाहिले पाहिजे असा सल्ला जाधव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला.
राज यांच्या भाषणाने शिवसेनेचे आमदार असणारे जाधव चांगलेच प्रभावित झाल्याचे चित्र दिसत आहे. राज ठाकरेंच्या भाषणात अनेक अर्थ दडलेले आहेत. कालचे राज ठाकरेंचं भाषण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. किंबहुना राज ठाकरेंनी काल जे भाषण केलं ते राजकीय दृष्ट्या प्रगल्भतेनं तसेच अतिशय वैचारिक पद्धतीने घेण्याची गरज आहे. परिपक्व राजकारणी म्हणून त्या भाषणाकडे बघण्याची आवश्यकता आहे. भाजपाच्या बृजभूषण सिंह या एका खासदाराला तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प करु शकत नव्हते का? हे ते बोलले. महाराष्ट्रातून हे कोणीही आपल्या अंगावर घेण्याची गरज नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचं दिसून येते. भाजपाचे खरं रुप काय, त्यांनी काढलेली नखे राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. म्हणून मी हे भाषण राजकीय प्रगल्भतेनं घेण्याची गरज आहे. गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं म्हणतोय असेही ते म्हणाले.
विशेष करुन महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांना मी विनंती वजा आवाहन करेल की कालचं राज ठाकरेंचं भाषण किंवा त्यांचा रद्द झालेला अयोध्या दौऱ्याच्या मुद्द्याला कुणीही हवा देण्याचं काम करु नये, कुणीही चेष्टेचा विषय करु नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केलेय.
भाजपा जी बी टीम, सी टीम करत होती. तर त्यातली सी टीम आज भाजपाकडून दूर करण्याच्या दृष्टीने या सभेकडे बघितलं पाहिजे. राज यांना हिणवण्याच्या दृष्टीने बघता कामा नये एमआयएम ही बी टीम आहे. ओवैसींनी सांगितलेलं की राज यांच्या कुठल्याही वक्तव्यावर कोणीही प्रतिक्रिया देऊ नये. याचा अर्थ फार खोल असल्याचेही ते म्हणाले.
Marathi e-Batmya