जयंत पाटील म्हणाले, मला कळत नाही अशा बातम्या बाहेर कशा येतात अलिप्त राहिलेले जयंत पाटील झाले पुन्हा सक्रिय

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आदेश दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गायब झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून ते नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र यासंदर्भात जयंत पाटील याना विचारले असता ते म्हणाले, मला कळत नाही की अशा बातम्या बाहेर कशा येतात. मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याने कोणावर नाराज व्हायचं असे प्रति सवालही यावेळी केला.

जयंत पाटील हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने तुम्ही नाराज आहात का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, माझ्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतं का? मी नाराज नाहीये.

विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झाल्यानंतर मधल्या काळात तुम्ही अलिप्त होता, याचं कारण काय? असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, मी अलिप्त नव्हतो. मी माझ्या मतदारसंघात नगरपालिका निवडणुकीची तयारी करायला पूर्णवेळ दिला होता. शहरातील प्रत्येक वार्डनुसार मी बैठका घेत होतो. त्यामुळे मी अलिप्त राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मीच पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मी कुणावर नाराज व्हायचं? अजित पवारांची पक्षाने नियुक्ती केली आहे. सगळ्यांनी विचार करून ही नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. पण मला कळत नाही की, अशा बातम्या बाहेर कशा येतात.

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या खोळंबलेल्या विस्तारावरही भाष्य केले.

कोणत्याही राज्याच्या मंत्रिमडळात किमान १२ मंत्री असावे, असा नियम आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मंत्रिमंडळाने सुमारे ७०० हून अधिक निर्णय घेतले आहेत. तसेच दोन आठवड्याच्या आत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. पण अद्याप निवडणुकांची घोषणा करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?

केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *