अर्थमंत्री सीतारामन यांचे अजब तर्कट, रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होतोय

२०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जब देश का रूपया गिरता है, तो वो देश भी गिरता है, डॉलर का रेट पंतप्रधान (मनमोहन सिंग) जी की उम्र को भी पिछे छोड देगा’ अशी वक्तव्य करत डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या घसरत्या मुल्यावरून त्यावेळी मनमोहन सिंग सरकारवर निशाणा साधला होता. मात्र विद्यमान परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मोदींच्या वयाच्या पुढे डॉलरची किंमत जाऊन आणि रूपयाची घसरण होऊनही त्याबाबत अवाक्षर काढलं नाही. परंतु देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी याबाबत वक्तव्य करत रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होत असल्याचे तर्कट मांडले आहे. त्यामुळे पुन्हा अर्थमंत्री सीतारामण या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील काही दिपसांपासून जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुपयाचे मूल्य तब्बल ८३ पैशांनी घसरले होते. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात मोठी पडझड होती.

यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, रूपया घसरत नसून डॉलर सातत्याने मजबूत होत आहे. रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करत आहे.

निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

या पत्रकार परिषदेत आगामी काळात रुपयासमोर कोणकोणती आव्हानं आहेत. तसेच या आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणकोणत्या उपायोजना करण्यात येत आहेत? असा प्रश्न सीतारामन यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, रुपया घसरत नाहीये तर डॉलर सातत्याने मजबूत स्थितीत पोहोचत आहे. इतर चलनांच्या तुलनेत भारतीय चलनाने चांगली कामगिरी केली आहे. अस्थिरतेला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहे, असल्याची सारवासारवही केली.

सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत सार्वकालिक निचांकी पातळीवर आहे. शुक्रवारी रुपया ८ पैशांनी गटांगळ्या खात डॉलरच्या तुलनेत ८२.३२ रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८२.२४ झाले होते. अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन यांनी रुपयाची घसरण होत नसून डॉलर मजबूत स्थितीत पोहोचत आहे, असे विधान केले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पुण्यात १० वर्षात ४०० कोटींची गुंतवणुक आणि एक हजार रोजगार निर्मिती राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार

राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *