संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, त्यांच्या पक्षांतर्गत बाब पण, शरद पवारांसारखे नेते… महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नसून पवारांसारखे नेते राजकारण, समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. पवारांनी घेतलेला निर्णय ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत बाब असून महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार यांच्या निर्णयामागे कोणतीही राजकीय खेळी नाही असे सांगतानाच संजय राऊत म्हणाले की, ‘एकाद्या पदावरून निवृत्त होणे म्हणजे राजकारणातून निवृत्त होणे नाही. या घडामोडी अचानक घडल्या आणि खळबळजनक असल्या तरीही त्यात अनपेक्षित काही नाही असे अलीकडच्या काही निर्णयांवरुन वाटते. राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निर्णयावर शिवसेनेने भाष्य करणे योग्य नाही पण ते शरद पवार असल्याने इतकेच सांगेन की, देशाला आणि राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे.’

‘शरद पवार यांनी घेतलेला निर्णय तो कोणत्या परिस्थितीत आणि का घेतला याचं विश्लेषण तेच करु शकतात. पण त्यांच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. पण लोकमतामुळे त्यांना पुन्हा शिवेसनाप्रमुख पदाचा राजीनामा मागे घ्यावा लागला. असे नेते निर्णय अनेकदा एका विशिष्ट परिस्थितीत घेतात. शरद पवार यांनी तशा परिस्थितीत तो घेतला असेल’, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद अध्यक्ष म्हणून शरद पवारच धुरा सांभाळतात. जसा शिवसेना पक्ष ठाकरे या एका नावावर चालला आहे. कुणी शिंदे, मिंधे, गिंडे गेले कुठेही आणि निवडणुक आयोगाने त्यांच्या हातावर पक्ष ठेवला असला तरीही ‘ठाकरे तिथे शिवसेना’ त्याचपद्धतीने जिथे ‘शरद पवार तिथे राष्ट्रवादी’ हे ठरलेले आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *