भाजपा झाली चिंतीत, ४० टक्क्याच्या रिपोर्ट कार्ड वाल्यांना घरचा रस्ता अजित पवार यांच्या येण्याने भाजपाची गोची वाढली, तर एकनाथ शिंदेंना तुमचं तुम्हीच बघा म्हणण्याच्या तयारीत

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे २०२४ च्या निवडणूकीतही आपणच पंतप्रधान पदी परत येणार असल्याची घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना केली. तसेच लोकसभा निवडणूकीत जागा वाढविण्यासाठी लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पाडण्याचे कामही सुरु करण्यात आले. परंतु आता हेच फुट पाडणे भाजपाच्या मुळाशी येणार असल्याचे भाजपाच्या मतदारसंघ निहाय आमदार-खासदारांचे रिपोर्ट कार्डची माहिती घेतल्यानंतर परिस्थिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी आणि कोअर कमिटीच्या बैठकीत नजरेस आल्याची माहिती पुढे आली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याची तयारी सध्या भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूकीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभाही मुदतीपूर्व बरखास्त करण्याची चाचपणी सध्या भाजपाकडून सुरु आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या आमदार-खासदारांच्या मतदारसंघातील कामाचा आढावा घेण्याचे काम पक्षाकडून सुरु करण्यात आले. परंतु राज्यातील बहुंताष आमदार- खासदारांच्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याची माहिती पुढे येत आहे. तर काही निवडक आमदार-खासदारांचे रिपोर्ट कार्ड चांगल्या स्थितीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ज्यांच्या विरोधात नाराजी जास्त आहे त्या आमदार-खासदारांचे तिकिट कापण्याच्या विचार भाजपाकडून सध्या सुरु असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने दिली.

तसेच नाराजी आहे की चांगले वातावरण आहे याचा क्रायटेरिया भाजपाने निश्चित केला असून ज्या आमदार खासदाराच्या मतदारसंघात ४० टक्क्यापेक्षा अधिक नाराजी आहे त्या आमदार खासदारास घरी बसवायचे अन् जर त्याचे रिपोर्ट कार्ड ५० टक्क्याहून अधिक आहे त्याच्या मतदारसंघात आणखी ५ टक्के जनतापयोगी काम करायचे आणि मतदारांना खुष करायचे अशी प्रणाली सध्या निश्चित करण्यात आल्याचेही त्या नेत्याने सांगितले.

दरम्यान भाजपा नेत्यांच्या बैठकीत सदरचे रिपोर्टची माहिती ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येण्याच्या आधीची आहे. मात्र अजित पवार यांच्या येण्याने भाजपा आमदार-खासदारांची भलतीच गोची झालेली आहे. त्यामुळे अजित पवार यांना बाहेर कसे काढायचे असा प्रश्न भाजपासमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओझे कसे सांभाळायचे असा सवालही या बैठकीत उपस्थित करण्यात आला असून राजकियदृष्ट्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसविणे फारसे राजकिय फायद्याचे ठरलेले नसल्याचेही मतही काही आमदार-खासदारांनी व्यक्त केले.

त्यामुळे अजित पवार यांना जरी सोबत ठेवले तरी एकनाथ शिंदे यांना तुमचे तुम्हीच बघा असे सांगण्याच्या तयारीत भाजपा असल्याची माहितीही बैठकीला उपस्थित असलेल्या अन्य एका नेत्याने सांगितले.

About Editor

Check Also

सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?

काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *