प्रफुल पटेल यांचा इशारा, भविष्यात पुस्तक लिहिणार…त्यात खूप काही मटेरियल मिळेल

माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार असून त्यावेळी मी माझी बाजू मांडेन आणि त्यात खूप काही मटेरियल मिळेल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वैचारिक मंथन शिबीरात केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या सत्रात खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

या शिबिराला असलेले दिलीप वळसे पाटील यांच्यादेखील पोटात खुप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या आहेत असेही प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत नाही, पुढील २० ते २५ वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. मी शरद पवारसाहेब यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि १९८६ मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चालले आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत असेही सांगितले.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, या शिबीर घेण्यामागे एक भावना आहे. पक्षात चिंतन, मंथन पक्षाचे ध्येय धोरण ठरवले जाते म्हणून हे शिबीर घेतले आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे हजारो, लाखो लोक आहेत. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय ही साधी गोष्ट नाही असेही आवर्जून सांगितले.

प्रफुल पटेल यांनी सांगितले की, जसा शंभर टक्के पवारसाहेबांच्या पाठीशी राहिलो तसा दादांच्या पाठीशी राहणार आहे. अजित पवार यांनी घेतलेली महत्वाची भूमिका ही राज्यासाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आमचा पक्ष सर्व धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे हे अजित पवार यांनी स्पष्टपणे दिल्लीत सांगितले. तसेच शाहू – फुले – आंबेडकरांचे विचार घेऊन काम करणार आहोत असेही जाहीर केले.

प्रफुल पटेल पुढे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या काळात आपली कसोटी आहे. १३० दिवसानंतर मतदानाची वेळ येणार आहे. शंभर दिवसात निवडणूकीची वाटचाल सुरू होणार आहे. काही राज्यातील निकाल काहीही येतील, परंतु देशाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने निकाल लागेल असेही विश्वासही व्यक्त केला.

प्रफुल पटेल म्हणाले, आपला पक्ष, आपलं घर मजबूत करायचे आहे. याकडे लक्ष द्यायचे आहे असे सांगत शरद पवारांनी कशापद्धतीने राजकीय भूमिका बदलल्या याची सविस्तर माहितीही दिली.

वैचारिक मंथन शिबीरामध्ये पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, संजय मिश्किन यांनी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, रुपाली ठोंबरे, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, अमेय तिरोडकर, आमदार अमोल मिटकरी आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *