राज्यातील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाकडून राज्याचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी व परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, यासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण विभाग व मुंबई विभाग या विभागातील शिक्षक, पालक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर आराखड्यातील त्रुटींवर अधिक चांगले काम करता येईल व एक परिपूर्ण आराखडा तयार करण्यास मदत होईल. वस्तूस्थिती पाहता शैक्षणिक विभागाने नागरिकांना अभिप्राय देण्यास दिलेला कालावधी कमी असल्याकडे लक्ष वेधले.
पुढे अंबादास दानवे म्हणाले की, शैक्षणिक विभागाने ३ जून, २०२४ पर्यंत अभिप्राय सादर करण्यास दिलेला आहे. मात्र आराखड्यातील त्रुटी दूर करुन परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हा कालावधीला १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणीही केली.