नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कशीबशी रायगडची जागा जिंकता आली. आता विधानसभा निवडणूकीला दोन-अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाच राज्यातील सर्वच राजकिय पक्षाकडून निवडणूकीची तयारी सुरु केली. त्यातच भाजपाने आज राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात घेत एकप्रकारे विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजवीत प्रचाराचा शुमारंभही केला. इकडे भाजपाचे अधिवेशन पार पाडले जात असताना अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पुणेतील कसबा मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांननी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना स्पष्ट म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. तसेच लोकसभा निवडणूका महायुतीत लढूनही राष्ट्रवादीला पुरेशा जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आगामी निवडणूका या स्वबळावर लढविण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी आणि त्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही यावेळी सांगितले.
दरम्यान, राज्यातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी भाजपाने १६० ते १८० जागा लढविण्याची तयारी सुरु केली असताना शिवसेना शिंदे गटाने १०० जागा लढविण्याची तयारी सुरु केली असून १०० जागांची मागणी भाजपाकडे केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिल्लक ६० ते ७० जागा अजित पवार यांच्या हिश्श्याला येत आहेत. इतक्याच जागा अजित पवार गटाने लढवाव्यात अशी भूमिकाही शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी विधानसभा निवडणूका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरु केल्याने तशी भूमिका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडल्याचे सांगण्यात येत आहे.