एससी, एसटी यांचे आरक्षण हे घटनात्मक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला घटनात्मक दर्जा नाही. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपा यांना विचारले होते की, ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा देवू पण या दोन पक्षांनी भूमिका घेतली की, याला संविधानिक दर्जा द्यायचा नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मोहोळ येथील आरक्षण बचाव यात्रेच्या सभेदरम्यान प्रकाश आंबेडकर बोलत होते.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षात राहून ओबीसींसाठी लढा द्यावा. तुम्ही आमच्यातच यावं अशी आमची मागणी नाही. पण तुम्ही ओबीसींना उमेदवारी मागितली पाहिजे असे आवाहनही यावेळी केले.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, धनगर, माळी किंवा अन्य ओबीसी समाजाचा मेळावा असेल तर लाखांनी लोक जमतात पण ओबीसींच्या नावाखाली १०० लोक सुद्धा जमत नाहीत. आता ओबीसींनी राजकीय ओळख दाखवली पाहिजे. ७ तारखेच्या औरंगाबाद येथील सभेचा उद्देश एकच आहे की, यातून ओबीसींचा राजकीय चेहरा आपल्याला उभा करायचा आहे ते केले तरचं आपलं आरक्षण वाचणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात एक नौटंकी सुरू आहे. ती म्हणजे मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असे नाटक दाखवले जात असल्याचेही यावेळी सांगितले.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, ओबीसी नेते अविनाश भोसीकर, ओबीसी नेते रमेश बारस्कर यांच्यासह विविध ओबीसींच्या संघटना आणि त्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.