बदलापूर येथील अत्याचाराच्या विरोधात उसळलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, बदलापूरचे आंदोलन राजकिय हेतूने प्रेरित होते. या आंदोलनात बाहेरील लोक सहभागी झाले होते, तर स्थानिक लोक बोटावर मोजण्याइतके होते. त्याचबरोबर दोन महिन्यापूर्वी अशाच एका प्रकरणात राज्य सरकारने फाशी दिल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फेक नॅरेटीव्ह चालविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप केला.
तसेच दोन महिन्यापूर्वी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव जाहिर करा अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.
त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील सत्यता शोधण्यासाठी वेगळ्या एसआयटीची मागणी केली. तसेच राज्य सरकारने जर अशाच एका प्रकरणात फाशीची शिक्षा दिली असेल तर त्या व्यक्तीची माहिती पुढे आली पाहिजे असेही यावेळी सांगितले. तसेच क्षमता नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान असल्याची टीकाही केली.
या टीकेवरून कोल्हापूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, हा लाडक्या बहिणींचा भाऊ कधी खोटं बोलत नाही, तुम्हा सर्वांना माहित आहे की, दिलेला शब्द मी पाळतो, मात्र मी काही महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याचे मी म्हणालो. त्यावरून विरोधकांनी एकच गोंधळ घातला. आज माझ्या हातात त्या प्रकरणातील न्यायालयाच्या निकालाची प्रत असून हे प्रकरण मावळ तालुक्यातील आहे. २०२४ एप्रिल-मे महिन्यात तेजस दळवी यास या प्रकरणात सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. त्याचे निकाल पत्र माझ्या हातात असल्याचेही यावेळी सांगत निकाल पत्र उपस्थित जनसमुदायाला दाखविले.
#Live | 📍कोल्हापूर 🗓️22-08-2024 📹 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' – प्रचार व प्रसार कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/45B8BwyZUo
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 22, 2024
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवलेली कोर्टाचा निकाल हा २०२४ मधील नसून तो दोन वर्षापूर्वीचा फाशीचा निकाल असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखविलेल्या निकाल पत्राबाबतही आता विरोधकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे.