महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे. मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.
बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या बलात्कार घटनेच्या निषेधार्थ नुकतेच महाविकास आघाडीच्यावतीने आंदोलन केले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाल्याचे सांगितले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमची महाविकास आघाडी ही काही त्यांच्या (सत्ताधाऱ्यांच्या) युतीसारखी मोडतोड तांब्या-पितळ आघाडी नाही. हा पक्ष फोड आणि कर युती, तो पक्ष फोड अन् कर युती असली आमची महाविकास आघाडी नसल्याची टीकाही सत्ताधाऱ्यांवर केली.
लखपती दिली कार्यक्रमावरून टीका करताना संजय राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी लखपती दिदीच्या कार्यक्रमाला आले होते, त्याच भागात चार महिलांवर अत्याचार झाले. मग लखपती दिदी कोणाला बनवता असा सवाल करत आधी बहिणीला सुरक्षा द्या मग लखपती दिदी करा असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, लखपती दिदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी जळगांवात आले होते ना. आधीच अत्याचाराच्या घटनांच्या तक्रारीची नोंद घेतली जात नाही. त्यात आता महिलांना ई-तक्रारीची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, मग काय आता महिलांनी ई-तक्रार दाखल करायची अन् पोलिस स्टेशनला सारख्या चकरा मारत बसायच्या काय असा उपरोधिक सवाल करत मग कोणी तरी पुढाकार घेऊन जनआंदोलन करेल आणि आहेच सरकारचे बगलबच्चे न्यायालयात जाऊन बंदी आणतील असा टोलाही यावेळी पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारला लगावला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, लखपती दिदी कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री भाषण करताना जमलेल्या महिलांना विचारत होते, पैसा मिला ना पैसा मिला ना, ही कुठली पद्धत पैसे मिळाले का म्हणून विचारायची असा खोचक सवाल करत त्यावेळी तेथे जमलेल्या महिलांमधील एका महिलेने उत्तर दिले की, हा मिळाला पैसा, हा पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांना करत हा जनतेचा पैसा आहे असे प्रत्त्युत्तरही दिल्याचे सांगत तो कार्यक्रम तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला त्या महिलेचे बोलणे नीट ऐकायला येईल असेही यावेळी स्पष्ट केले.