निवडणूक काळात आयोगाकडून ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नये, अशी तरतूद आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणा कार्यरत असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके (एस.एस.टी.) आणि भरारी सर्वेक्षण पथके (एफ.एस.टी.) तैनात आहेत. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ६ हजार पथके आणि १९ अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या आहेत.

स्थिर आणि भरारी पथकांना प्रत्येक वाहनाची तपासणी करून संशयास्पद काही आढळल्यास पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत. निवडणूक काळात विविध पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक हवाई मार्गाने दौरे करतात; त्यांचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांची देखील तपासणी केली जाते. सर्वच नागरिकांच्या वाहनांची तपासणी केली जाते व त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही. स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त असलेल्या ठिकाणांहून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी होते, पथकामध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल आणि इतर विभागाचे कर्मचारी असतात. तपासणी करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. संशयास्पद वस्तू आढळल्यास, जसे की पैसा, दारू, मौल्यवान धातू, त्या जप्त करून नियमाप्रमाणे कारवाई केली जाते.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेदरम्यान आतापर्यंत सर्व अंमलबजावणी यंत्रणा व स्थिर आणि भरारी पथकांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करून कार्यवाही केली आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. तरीही असा कोणताही प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यास, सी-व्हिजिल ॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा करण्यात आले आहे.

 

About Editor

Check Also

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *