“अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. राज्यात पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी शेतक-यांना मंजूर झाला आहे. मंजूर केलेला निधी पुढच्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ऊर्वरित बाधित जिल्ह्यातील पंचनाम्यांचे काम अंतिम टप्यात असून त्यांनाही पुढील काही दिवसात शासन स्तरावर निधी मंजुर होऊन शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा होईल” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषीमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील अमानी गावाला भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी कृषी मंत्र्यांनी जाणून घेतल्या. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत २०५,८१० हेक्टरचं दोन्ही वेळेसं आलेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे.जवळपास दोन लाखांहून अधिक बाधित शेतक-यांची संख्या आहे. जिल्हा प्रशासनानं सादर केलेल्या ऑगस्ट महिन्यातील शेती पीक नुकसानग्रस्त प्रस्तावात १४३ कोटी ६४ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी पुढील काही दिवसात मंजुर होऊन मदत शेतक-यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात एकूण ३८ हजार हेक्टरचं नुकसान झालं असून पंचनामे केलेला सप्टेंबर महिन्याचा प्रस्ताव शासनास सादर झाल्यावर वाशिममधील ऊर्वरित बाधित शेतक-यांनाही तात्काळ मदत मिळणार आहे.
‘अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यातील शेतक-यांना मोठं नुकसान झेलावं लागलं आहे. या अतिवृष्टीमध्ये राज्यात प्रामुख्याने खरीप हंगामातील जिरायती, बागायती आणि फळ पिकांना फटका बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, बाजरी, ऊस, कांदा आणि ज्वारी या पिकांचं नुकसान जास्त आहे. तसेच या व्यतिरिक्त, काही ठिकाणी भाजीपाला, फळ पिके आणि हळद या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान दिलेल्या माहितीनुसार,”राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यातील ६३ लाख ५८ हजार ३०० एकर क्षेत्र बाधित झाले आहे.सरकारने आतापर्यंत पंचनामे पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्यात जून आणि जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांसाठी ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार इतका निधी मंजूर झाला असून यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्यात नांदेड जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यात जिरायती पिकांना ८५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांना १७००० रुपये प्रति हेक्टर आणि फळ पिकांना २२५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यात पंचनाम्यांचं काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे.”
बाधित जिल्हे
नांदेड, वाशिम, यवतमाळ, बीड, वाशीम, सोलापूर, धाराशिव, बुलढाणा, अहिल्यानगर, जालना, अकोला, हिंगोली, अमरावती, वर्धा, परभणी, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, सांगली, छ. संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, पुणे, नंदुरबार, रत्नागिरी, रायगड, सातारा, धुळे, लातूर, आणि सिंधुदुर्ग.
Marathi e-Batmya