वाशिम – कारंजा: प्रतिनिधी
रोज महाराष्ट्रात ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ हजार शेतकरी महिला विधवा झाल्या, त्यांचे संसार उध्वस्त होत आले आहेत. गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.
माणसं फोडण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत असून कर्नाटकच्या आमदारांना संरक्षण मात्र महाराष्ट्र सरकारचे होते. ज्यांना तुम्ही बसवलं त्यांनी आपले संसार बुडवले आहेत. यासाठी यांना निवडून दिले आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
तुम्हाला जगणं मुश्किल होणार असून यात सुधारणा करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात संधी येणार आहे. विचार करा व आघाडीचे सरकार निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
राजकीय भ्रष्टाचाराची भाजपसारखी दुसरी पार्टी नाही – मुंडे
राजकीय भ्रष्टाचार करणारी भाजपसारखी दुसरी पार्टी नाही अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.
जनतेला शेततळी दिली ती याअगोदर कधी दिली गेली नाहीत म्हणून दिली असे मुख्यमंत्री सांगत होते. परंतु ती सध्या गुप्त आहेत ती फक्त भाजपच्या पुण्यवान लोकांनाच दिसतात. जलयुक्त योजनेत मुरलेले पाणी फक्त भाजपच्या पुण्यवान लोकांच्या मुखात पडते असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.
वनमंत्री यांनी तर आगळीवेगळी योजना आणली ३३ कोटी वृक्ष लागवड केली आणि आता ३८ कोटी वृक्षलागवड केली आहे. अरे पण इतके वृक्ष कुठे लावले ? त्यांना पाणी कुठुन मिळणार भाजपच्या विहिरीचे की जलयुक्त मधून मिळणार आहे असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मतांची भीक मागत फिरत होते. मात्र त्याचवेळी जनता पाण्यात बुडाली होती. बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू होती. भुकेने व्याकूळ झाले होते. गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने फिरले आणि त्यांचे मंत्री सेल्फी काढत होते. लाज वाटायला हवी यांना अशा शब्दात भाजपाचा त्यांनी समाचार घेतला.
आशा-आकांक्षाना सुरुंग लावणार्या सरकारला खाली खेचा – खासदार डॉ. कोल्हे
माता भगिनींनो तुम्हाला जास्त महत्व आहे. तुमच्या आशा – आकांक्षाना सुरुंग लावणार्या सरकारला खाली खेचण्याचे काम करायचं अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यातील महिलांना आवाहन केले.
शेतकऱ्यांचा कैवार कोण घेतंय हे लक्षात घ्या. आज रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे का करत आहेत लक्षात घ्या. रोजगार गेला, पीक विमाच्या परतावा मिळाला नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरी आपण थंड आहोत म्हणूनच आपल्या डोक्यावर मिरच्या वाटल्या जात आहेत असल्याचे ते म्हणाले.
थंड आहोत… शांत आहोत… कारण आपल्या हातात स्मार्टफोन आहे त्यात मेसेज येतो देशप्रेमाचा…डोक्यात वेगवेगळे विषय… आंगठा चालतो कर फॉरवर्ड… भविष्याचा विचार करून चला… सातबारा कोरा होत नाही, कर्जमाफी होत नाही, रोजगार देणार याचं काही येत नाही याचा विचार करा असे आवाहनही त्यांनी केले.
वाशिम डॉक्टर असोसिएशनच्यावतीने अजितदादा पवार, धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्यावतीने अजितदादा पवार यांना रक्षाबंधन करण्यात आले.
शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा १९ ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे. शिवस्वराज्य यात्रेचा आजचा दुसरा दिवस आणि पहिली सभा वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे पार पडली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुभाष ठाकरे, आमदार प्रकाश गजभिये,माजी आमदार सुदर्शन निमकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, अमोल मेटकरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, संग्राम गावंडे आदींसह वाशिम जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Marathi e-Batmya