नाशिक: प्रतिनिधी
शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी केली.
शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाची सखोल माहिती घेऊ व स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन सरकार दरबारी दाद मागू असे सांगतानाच सरकार संवेदनशीलपणे आमचे म्हणणे ऐकून मदत करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शासनाच्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी यावेळी शरद पवारांनी चर्चा केली. त्यावेळी सरकारने नुकसान भरपाईसाठी कोणता ठोस निर्णय घेतला नाही अशी माहिती दिली. शिवाय नुकसानभरपाईसाठी सरकारकडून जे निकष आता लावले जात आहेत ते दोन ते तीन वर्षांपूर्वीचे आहेत. मात्र आजची परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तांदूळ, द्राक्ष, सोयाबीन, मका सर्वच पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी पिकांवर जो खर्च केला तो वाया गेला आणि त्यांच्या हाती उत्पन्नही लागले नाही असे सांगतानाच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या गोबापूर- कळवण तालुका येथील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या.
Marathi e-Batmya