पोलिओप्रमाणे जात हद्दपार होणार नाही का? : नागराज मंजुळे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाची सप्तसेंच्युरी

मुंबई : प्रतिनिधी

माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे. मानवाचा जन्म प्रेम करण्यासाठी मिळाला आहे. जात-पात ही मानवानेच निर्मिली आहे. आज भारतातून पोलिओ हद्दपार झाला म्हणून आपण मिरवतो, तशी जात नाही का हद्दपार होऊ शकत? असा सवाल करीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या मनातील भावना प्रगट केल्या. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या बहुचर्चित नाटकाच्या ७००व्या प्रयोगाच्या निमित्ताने नागराज यांनी आपले विचार व्यक्त केले. मुंबईतील माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा ७०० वा प्रयोग संपन्न झाला.

शुभारंभाच्या प्रयोगापासूनच चर्चेत राहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने मागील सहा वर्षांमध्ये विविध ठिकाणी प्रयोग करीत ७०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग पाहूनही नागराज मंजुळे यांनी ७०० व्या प्रयोगाला आवर्जून हजेरी लावली. याखेरीज निर्माता-अभिनेता भरत जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आमदार दिलीप मोहिते-पाटील, पत्रकार युवराज मोहिते आदी मान्यवरांनीही या प्रयोगाला उपस्थित राहून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’च्या टिमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

एकविसाव्या शतकातही आपण जाती-पातीचं राजकारण करतोय याची घृणा येत असल्याचं सांगत नागराज म्हणाले की, जातीला मी माझा खूप मोठा शत्रू मानतो. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करीत आहे. आजच्या पिढीला याच विचारांची खरी गरज आहे. या दोन थोर व्यक्तींनी कधीच जात-पात, धर्मभेद बाळगला नाही. त्यांची कामगिरी चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य आजवर करण्यात आलं आहे. त्यामुळेच चांगले विचार देणारं चांगलं पुस्तक आणि वाईट विचार देणारं वाईट पुस्तक ही या नाटकात मांडलेली व्याख्या मला खूप भावली. हे नाटक पाहताना दोन वेळा माझ्या डोळे पाणावले. कारण या नाटकातील विचार थेट हृदयाला भिडणारे आहेत. या नाटकातील शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचं माप तुमच्या-आमच्या सर्वांच्या मेंदूशी जुळो ही सदिच्छा देत नागराज यांनी नाटकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भरत जाधव यांनीही ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’च्या संपूर्ण टिमचं तोंड भरून कौतुक केलं. प्रेक्षकांचा ‘टाइमपास’ करण्यासाठी आम्ही आहोतच, पण ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातील कलाकार हेच आजचे खरे सुपरस्टार आहेत. त्यांना माझा सलाम… या नाटकाच्या लेखकांनाही सलाम आणि हे नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही सलाम. कारण अशा प्रकारचं नाटक पाहण्यासाठी धाडस लागतं. मराठी प्रेक्षकांनी हे धाडस दाखवत या नाटकाला ७०० व्या प्रयोगापर्यंत आणलं आहे. यापुढेही हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिल. या कलाकारांची मेहनत आणि शिवराय-भीमराय यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याची धडपड पाहून आपणही दोन महिन्यातून एक वेळ या नाटकासाठी वेळ देणार असल्याचं भरतने जाहिर केलं.

आमदार दिलीप मोहिते-पाटील म्हणाले की, या नाटकाचे निर्माते भगवान मेदनकर यांच्यासह संपूर्ण टिमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. यापूर्वी भगवान यांनी बऱ्याचदा नाटकाच्या शोला येण्याचं आमंत्रण दिलं; परंतु येणं शक्य झालं नाही. कारण ७०० व्या प्रयोगाला नागराज मंजुळे, भरत जाधव यांसारख्या थोरांच्या पंक्तीत विराजमान होऊन ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ पाहण्याचा योग जुळून यायचा होता. या नाटकातील विचार थोर आहेत आणि हेच विचार जगाला तारक असल्याचं मत आमदार यांनी व्यक्त केले.

पत्रकार युवराज मोहिते यांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रवास सुरुवातीपासून पाहिला आहे. तालिमीपासून हे नाटक रंगभूमीवर येईपर्यंत या नाटकाच्या टिमने दिलेल्या लढ्यात ते पावलोपावली त्यांच्यासोबत होते. ७०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने बोलताना मोहिते यांनी या नाटकाच्या खडतर प्रवासाची आठवण करून दिली. वर्तमानपत्रांपासून सर्वांनीच सुरुवातीला कसे हात वर केले आणि नंतर नाटक पाहिल्यावर कशाप्रकारे भरभरून कौतुक केलं हे देखील मोहिते यांनी सांगितलं.

२०१२ मध्ये रंगभूमीवर अवतरलेलं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांची प्रस्तुती आहे. भगवान मेदनकर या नाटकाचे निर्माते आहेत. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन नंदू माधव यांनी केलं आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत. नाटकाची संकल्पना, गीत, संगीत शाहीर संभाजी भगत यांचं आहे.

About Editor

Check Also

पार्श्वगायिका आशा भोसले, यांचा आवाज अखेर कायमचा शांत ब्रीच कँडी रूग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायिका आणि आपल्या अमोघ वाणीने सर्व रसिकांच्या मनाला भूरळ घालणाऱ्या आशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *