मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज

राज्यातील मुंबईसह पुणे रायगडसह जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून आणि पहाटेपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर सखल भागात पाऊसाचे पाणी जमा झाले. तर अनेकांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. तर अनेक नदी-नाले तुडूंब भरून वाहु लागले. शिवाय अनेक भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नदी-नाल्याच्या पुलावरून पाणी भरून वाहु लागल्याने अनेक ठिकाणचा संपर्क तुटला.

मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्रीनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाउस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. मुंबईत कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु आहेत. मी मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे. पाउस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, माझं आपणास आवाहन आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करीत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

About Editor

Check Also

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर ८ मे पर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-1 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *