मुंबई: प्रतिनिधी
दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला विजेते पद मिळवून भारतीय टीमचा कर्णधार विक्रांत केणीचा राज्य शासनातर्फे जाहीर सत्कार करण्यात यावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या हुरहुन्नरी क्रिकेटपटूच्या कामगिरीची दखल घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्याचे मनोबल वाढवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जुलै २०१९ मध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. मात्र उपांत्य फेरीमध्ये भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. हे अपूर्ण स्वप्न पालघर मध्ये राहणाऱ्या विक्रांत केणीने पूर्ण केले. या दिव्यांग खेळाडूने ५ ऑगस्ट -१५ ऑगस्ट २०१९ दरम्यान इंग्लंड येथे संपन्न झालेल्या दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय टीमच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली आणि भारताचा विजय झाला. भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. त्यामुळे असा अद्वितीय खेळाडू ज्याच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय टीमने दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जेतेपद पटकाविल्याने त्याचा सन्मान व्हावा ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya