रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्योगमंत्री सामंत यांच्या पुढाकाराने पंधरा दिवसांत या विषयासंबंधी सातत्याने बैठका घेऊन तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अनेक संघटनांना विश्वासात घेऊन प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा केल्याबद्दल उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाचे विशेष आभार मानले.
दरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधीनी प्रसारमाध्यमांशी बोलताा म्हणाले की, राज्य सरकारबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान रिक्षा भाड्यात दोन रूपये तर टॅक्सी भाड्यात तीन रूपये वाढीवर एकमत झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. तसेच ही दरवाढ एक ऑक्टोंबरपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून करण्यात येणारा संप मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
Marathi e-Batmya