रत्नागिरी, सिंधुदूर्गसह चार ठिकाणच्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरु होऊ शकते, त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मुंबई विद्यापीठाची आढावा बैठक घेताना त्यांनी वरील निर्देश दिले.
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच विद्यापीठाने शासनाशी समन्वय ठेवावा, शासन विद्यापीठांचा विकास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल असे सांगत मुंबई विद्यापीठातील सोयी-सुविधा आणि अडचणीसंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.
मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी उपकेंद्र सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण यापैकी जेथे विद्यापीठाची जागा अधिक असून बांधकाम तयार आहे. कमी कालावधीमध्ये जिथे उपकेंद्र सुरु होऊ शकते त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. आणि यासाठी संचालक आणि समन्वयकाची नेमणूक करुन उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मुंबई विद्यापीठाच्या इमारत दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ता सुधारण्यासाठी लागणारा निधी सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) च्या माध्यमातून उपलब्ध करता येईल का याबाबत विचार करावा. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे, व्हर्च्युअल क्लास रुम तयार करुन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे प्रशिक्षण सुरु करावे. कोकण विभागात पर्यटन, मत्स्यव्यवसाय, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, फलोत्पादन यासारख्या रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असलेल्या विषयांचे विद्यापीठांनी अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने रोस्टर तपासून प्राध्यापकांची रिक्त पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच नवीन परीक्षा भवनाच्या इमारतीचा ताबा घेण्यासाठी कार्यवाही करावी. लवकरच मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, संबंधित प्राध्यापक उपस्थित होते.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, पक्ष फोडण्यासारखे पेपर फुटीचेही पेव फुटले, सरकार नावाची व्यवस्था आहे की नाही? टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करा

रविवारी होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *