‘बेकायदेशीर सीएम शिंदे आणि राजवटीने आज भारतीय हवाई दलाचे सी-२९५ विमान नवी मुंबई विमानतळावर उतरवले. हे विमान कच्च्या आणि लहान धावपट्टीवरदेखील उतरू शकते. विमानतळाचे बांधकाम सुरू आहे. अजूनही विमानतळ पूर्णपणे तयार नाही . ही स्टंटबाजी थांबलीच पाहिजे, कारण यामुळे भारतीय हवाई दलाचा वेळ आणि करदात्यांच्या पैशाचा खर्च होत आहे. हवाई दलाची विमाने ही अशा कच्च्या रस्त्यांवरही उतरू शकतात. पण हे नागरी विमानतळ आहे आणि ते टर्मिनलसह प्रवासी वाहतुकीसाठी तयार झाल्यानंतरच; पूर्णपणे तयार आहे, असे मानले जाईल. त्यामुळे आजचा हा स्टंट करण्याची गरजच काय होती ? असा सवाल शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी करण्यासाठी वायुदलाचे विमान धावपट्टीवर उतरवले. त्यावर भाष्य करण्यासाठी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या विमानतळाला नाव दि बा पाटील यांचे दिले आहे तसे चोवीस तासात करा. नावाप्रमाणेच आमच्या मंत्रिमंडळाने आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मार्च २०२० मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे केले होते. हे देखील केंद्र सरकारकडे ४ वर्षांपासून प्रलंबित आहे. ह्यावरून भाजपाचा महाराष्ट्र द्वेष दिसून येतोच आणि ते घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ह्यांना आपले राज्य कसे लुटायला देत आहेत, तेही दिसते. सर्वप्रथम, २०२२ मध्ये आमच्या मंत्रिमंडळाने मंजूर केल्याप्रमाणे केंद्र सरकारने अद्याप नवी मुंबई विमानतळाला अधिकृतपणे ” दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नाव का दिले नाही? ते त्यांच्या मित्रांसाठी कधीही मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात, पण महाराष्ट्राच्या फायद्यासाठी कधीही घेत नाहीत. अशीही टीका यावेळी केली.
महाराष्ट्रात हरतायेत म्हणून महामंडळ आणि विविध निर्णय
महाराष्ट्रात ते हरतायेत म्हणून आता महामंडळ आणि विविध निर्णय घेतले जातायत. मागच्या दोन वर्षात का घेतले नाही ते निर्णय ? निवडणुकीपूर्वी हे निर्णय घेतले जातायत असं सांगत आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तसचं निर्णय घेत असताना अवघ्या काही मिनिटांमध्ये अजित पवार हे बाहेर पडले. खरंतर असं होत नाही की अर्थमंत्री असे कॅबिनेट बैठकीत निर्णय घेताना बाहेर पडतात. नक्कीच या सगळ्या मध्ये किती गडबड झाली हे लोकांसमोर येईल आणि मुख्यमंत्र्यांचे एवढेच काम आहे की जाती-जातीमध्ये वाद झाला पाहिजे धर्मामध्ये झाला पाहिजे, त्यांना हे काम भाजपाने दिल आहे आणि कॅबिनेटमध्ये जे काही सगळे निर्णय घेतले गेले ते सगळे आवश्यक होते का, त्यात पारदर्शकता होती का ? असा सवाल करत आम्ही मिंदे सरकारचे घोटाळे समोर आणत आहोत. गेल्या ४-५ कॅबिनेट बैठका झाल्या, काल १२० निर्णय होते ८० निर्णय बाहेर आले. लोकांना यामध्ये फसवले जातं आहे. मग २ वर्ष काय केलं या सरकारने ? असा सवालही यावेळी केला.
ओरिजनल ते ओरिजनल, थर्ड कॉपी बाजारात मिळतात
दसरा मेळाव्याच्या टिझर वरून आदित्य ठाकरे यांनी टीका करताना म्हणाले की, ते मिंधेंच्या घरातले हे संस्कार आहेत. तुमच्यात हिम्मत असेल तर शिंदेनी स्वतः चा चेहरा घेऊन निवडणूक लढवावी. बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा काढून टाकावा, धनुष्यबाण चिन्ह घेऊ नये आणि शिवसेनेचे नाव लावू नये. शेवटी ओरिजनल ते ओरिजनल, अश्या थर्ड कॉपी बाजारात मिळतात अशी खोचक टीका करत विचारांचा मेळावा म्हणतात पण ते कुठे महाराष्ट्राचा विचार करतात ? ते तर गुजरातचा विचार करतात असा उपरोधिक टोला लगावला.
Marathi e-Batmya