मागील काही दिवसांपासून भाजपाच्या मदतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षातील खासदारांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबविण्यात येत असल्याची चर्चा होती. त्यातच शिवसेना उबाठातील सहा खासदार ही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु होती. अखेर शिवसेना उबाठातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने या सहा खासदारांना केंद्र आणि राज्य सरकारने अतिरिक्त सुरक्षा पुरवित त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली.
यासंपूर्ण घडामोडीवरून या ऑपरेशन टायगरच्या मागे असलेल्या अमित शाह यांनी यासंदर्भात पहिल्यांदाच भाष्य करत आता एकच शिवसेना राहिली असे मोठे वक्तव्य करत नाहीतर आधी शिंदे गट असं बोलावं लागत असायचे असे सांगत सूचक विधान केले. दरम्यान ज्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला असल्याची चर्चा सुरु असली तरी या सहा खासदारांनी आपली अधिकृत भूमिका अद्याप जाहिर केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी थोडी संदिग्धता निर्माण झाली आहे. मात्र ऑपरेशन टायगरवरून मात्र दोन्ही शिवसेना गटात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी असे विधान केले असल्याने एक शिवसेनेचे दोन तुकडे केले. आता दुसऱ्या शिवसेनेवरही लवकरच संपविण्याची राजकीय खेळी खेळली जाणार असल्याचे अप्रत्यक्ष इशारा दिला नाही ना अशी चर्चाही या निमित्ताने सुरु झाली आहे.
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, आधी एकनाथ शिंदेंच्या पाठी शिवसेना शिंदे गट असं बोलावं लागयचं. मात्र आता गट राहिला नाही, आता एकच शिवसेना राहिली असे म्हणत उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
कोल्हापूर येथील कार्यक्रमात अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच शिवसेनेचे (शिंदे) अध्यक्ष एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. या आधी एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या पाठी शिवसेना शिंदे गट असं बोलावं लागायचं. मात्र आता कोणता गट राहिला नाही. आता एकच शिवसेना राहिली आहे असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya