पाटील म्हणाले, शरद पवारांना द्यायचं की नाही तो त्यांचा प्रश्न, पण जिंकणार मोदीच विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे

युपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.
यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काही बोलणार नाही. तथापि, भारतीय जनता पार्टी बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करत आहे. त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदीची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील.
केवळ सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे घटकपक्ष एकत्र राहिले असले तरी त्यांच्यातील विसंवाद सतत समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या पंचवीस आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निधी वाटपातील अन्यायाबद्दल पत्र लिहिले. प्रशासनाची वाताहत झाली आहे. अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी तात्पुरत्या नेमणुकीवर केंद्र सरकारमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत तर काहीजण शिष्यवृत्ती मिळवून प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या धडपडीत आहेत. या सगळ्यात जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. एसटीचा संप, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या सोडविल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. भाजपा ही निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *