भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे १९-२० रोजी नागपूरात राष्ट्रीय महाअधिवेशन

अधिवेशनाला भाजपाध्यक्ष अमित शाह, गडकरी उपस्थित राहणार

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चातर्फे १९ व २० जानेवारी रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या महाअधिवेशनाला १२०८ अनुसूचित जातीतील जाती सहभागी होणार आहेत. तसेच भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे देशभरातील सहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील तर २० जानेवारी रोजी होणाऱ्या जाहीर सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या महाअधिवेशनातून देशभर संदेश जाईल, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. विजय सोनकर शास्त्री यांनी मंगळवारी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार भाई गिरकर, भाजपा प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुभाष पारधी, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी व प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहतोल, सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला व केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल महाअधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या केंद्र सरकारने अनुसूचित जातींसाठी बरेच काम केले आहे. स्वच्छ भारत योजनेतील शौचालयांची बांधणी, प्रत्येकाचे बँक खाते उघडण्याची जनधन योजना, व्यवसायासाठी कर्ज देण्याची मुद्रा योजना, प्रत्येक घराला वीज पुरवठा देण्याची सौभाग्य योजना, प्रत्येक गरीब कुटुंबाला गॅस कनेक्शन देण्याची उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा मोदी सरकारच्या योजनांचा अनुसूचित जातींतील कोट्यवधी लोकांना लाभ झाला आहे. स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जातींसाठी सर्वाधिक काम मोदी सरकारने केले आहे. नागपूर येथे होणाऱ्या महाअधिवेशनात याविषयी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे. बाबासाहेबांचे जन्मस्थान, महापरिनिर्वाण झाले तो दिल्लीतील बंगला, मुंबईतील चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी आणि लंडनमध्ये विद्यार्थीदशेत बाबासाहेब राहिले तो बंगला यांचा विकास सरकार तीर्थस्थान म्हणून करत आहे. सरकारच्या या कामाची महाअधिवेशनात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *