मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर भाजपाकडून पहिल्यादांच आपली भूमिका जाहीर करत कधीही आनंदाची बातमी जाहीर होणार असल्याचे सांगत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या कोंडीप्रश्नी चर्चा करण्यासाठी भाजपाच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह आठ वरिष्ठ नेते उपस्थित होते.
तब्बल दोन तास ही बैठक वर्षा या निवासस्थानी सुरू होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
सत्ता स्थापनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाबाबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेनेची चर्चेची दारे खुली आहेत. मात्र जे ठरलंय त्याचे लिखित आश्वासन भाजपाने द्यावे या मागणीचा त्यांनी पुनःरूच्चार केला.
Marathi e-Batmya