मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण… कोल्हापूर येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ

आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरूवात झाली. खासदार धैर्यशील माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी शुभेच्छा संदेशाद्वारे म्हणाले, तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ आई अंबाबाईच्या करवीर येथून होत आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली रेल्वे अयोध्येसाठी रवाना होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य असे मंदिर साकारलेले आहे. प्रभू रामांचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी अयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आई अंबाबाईच्या चरणी प्रणाम करून सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांनाही विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री शिंदे शेवटी बोलताना म्हणाले की, ज्येष्ठांना राज्य व देशातील तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक समाधान मिळवणे सोपे होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांचा आपण प्रवास, निवास, भोजन खर्च करणार आहोत. भारतातील ७३ आणि आपल्या राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश केला आहे. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते आहे. तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे १०, वैद्यकीय मदतीसाठी तीन तर आयआरसीटीसीचे २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून अंमलबजावणी सुरू होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जातेय हे माझे भाग्यच – पालकमंत्री हसन मुश्रीफ

शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ कोल्हापुरातून होतोय याचा आनंद झाल्याचे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जातेय हे माझे भाग्यच असल्याची भावना व्यक्त केली. यात्रेकरूंना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता अधिकारी घेत असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *