मुंबईः प्रतिनिधी
राज्यात काँग्रेस पक्षांतर्गत थोडेसे बाजूला फेकले गेलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा मानाचे स्थान देत त्यांचे राजकिय पुर्नवसन करण्याचा निर्णय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेत तशा नावांची यादी दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना पाठवून दिली. अखेर त्या यादीस काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूरी दिली असून राज्याच्या सांसदीय मंडळात बाजूला फेकलेल्या जर्नादन चांदूरकर, संजय निरूपम यांना स्थान देत ४ नव्या उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्यावतीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
आता राज्याच्या संसदीय मंडळात इतर नेत्यांबरोबरच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार संजय निरूपम, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष जर्नादन चांदूरकर, मुंबईचे माजी कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचाही समावेश करण्यात आला आहे. तर नव्याने ४ उपाध्याक्षांच्या यादीत नाना गावडे, सचिन नाईक, संजय राठोड, माजी महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांची नियुक्ती करण्यात आली.
काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या कार्यकारणीत सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा आणि पक्षापासून दुरावलेल्या नेत्यांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीबरोबरच इतर निवडणूकांमध्ये काँग्रेसला विजय मिळेल का? हे आगामी काळातच समजेल. मात्र सर्वांना सोबत घेवून जाण्याच्या पटोले यांच्या रणनीतीला यश मिळेल का याचेही उत्तर मिळण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

Marathi e-Batmya