एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे नेमके कोण? काँग्रेसने घेतले पहिल्यादांच नाव काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतले सूत्रधाराचे नाव

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीच्या मागे नेमके कोण याविषयीच्या चर्चा महाराष्ट्रातील घराघरात रंगल्या आहेत. मात्र या बंडखोरीमागे नेमके कोण याविषयी आतापर्यंत राजकारणात तरी कोणीही कोणत्याही पक्षाचे नाव अथवा भाजपाच्या नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागील व्यक्तीचे नाव घेतले. त्यामुळे राजकिय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की,हे बघा, हे सगळं जे कारस्थान आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे. दर दिवसाआड देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात, अमित शाहांना भेटतात, नड्डांना भेटतात, आणखी कुणाला भेटतात…पुढची रणनीती आखतात. ईडीचं काय करायचं? कुणावर कसा दबाव टाकायचा? त्यानंतर साधनसामग्रीची व्यवस्था करतात. दर दोन दिवसाला हे सुरू आहे. त्यामुळे याचा सूत्रधार कोण आहे? याचा कर्ता करवीता कोण आहे? हे आता स्पष्ट झालं आहे. याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा बैठका झाल्या असतील, उद्या परवा पुन्हा बैठका होतील असे थेट नाव घेऊन अंगूलीनिर्देश केला.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील राजकीय स्थिती जैसे थे ठेवायला सांगितली आहे. याचा अर्थ कुणीच काही करू नका, ११ जूनला सुनावणीच्या दिवशी त्याच प्रकारची परिस्थिती असायला हवी असं न्यायालयाने सांगितलं आहे. असं असताना विधान सभेत अविश्वास ठराव आणला जाईल, अशी चर्चा सुरू आहे. पण यामध्ये अनेक घटनात्मक पेच असल्याचंही त्यांनी सांगितले.

वैधानिकदृष्ट्या शिवसेना पक्षात अद्याप फूट पडली नसल्याचं देखील त्यांनी सांगितले. शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असून रिसोर्ट पॉलिटिक्स सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार आहेत का? याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला फेसबूक लाइव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी ‘मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे’ असं म्हटलं होते. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरल्या असाव्यात. पण आम्ही शेवटपर्यंत लढायचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *