मुंबईः प्रतिनिधी
भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असून त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्याचबरोबर जे आमदार त्यांच्यासोबत गेले ते परत आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडे येत असल्याचे सांगत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहोत, एकत्र राहणार असून राज्यात या तीन पक्षाचे सरकार येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी निवड झाल्यामुळे त्यांनी विधिमंडळातील सदस्याची सही असलेले पत्र कार्यालयातून नेले असण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याबरोबर नेमके किती आमदार होते याची माहिती घेत आहोत. मात्र जे गेले त्यापैकी अनेकजण परत येत असून यातील राजेंद्र शिंगणे, सुनिल भुसारा, संदीप क्षिरसागर आणि सुनिल शेळके येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र आम्हाला विश्वास आहे की, त्यांना ते करता येणार नाही. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला स्पष्ट बहुमताचे संख्याबळ आम्हा तिन्ही पक्षाकडे आहे. त्यामुळे त्याचे सरकार अल्पमतात आल्यानंतर आम्ही सरकार बनविण्यासाठी आता जशी काळजी घेतली. तशी काळजी- खबरदारी घेवू आणि ती घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
अजितदादा पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार यांच्याबाबत पक्षाची बैठक दुपारी ४ वाजता होणार असून त्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच त्यांचे कृत्य हे शिस्तभंगाचे असल्याने त्याबाबत पक्षाची शिस्तपालन समिती निर्णय घेईल असे सांगत पक्षाचा सच्चा कार्यकर्ता कधीही भाजपासोबत सत्ता स्थापन करू शकणार नाही. तसेच पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई होईल. याशिवाय ते विद्यमान परिस्थितीत अपात्र ठरले आणि नव्याने निवडणूकीला सामोरे गेले तर त्यांच्या विरोधात तिन्ही पक्षांच्यावतीने संयुक्त उमेदवार देवून त्यांचा पराभव करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
सकाळी पावणे सात वाजता आमच्या सहकार्याने टेलिफोन करुन सांगितले की, आम्हाला राजभवन येथे आणले आहे. मला राज्यपाल सर्व कार्यक्रम सोडून तयार आहेत याचे आश्चर्य वाटले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही सदस्य गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतला असल्याचे सांगत त्याची कल्पना आपणास दिली. तसेच यासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी ते माझ्या घरी आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र शिंगणे, संदीप क्षिरसागर, भुसारा आदी आमदारांनी सकाळी घडलेला प्रकार पत्रकार परिषदेत ऐकविला. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेले सुनिल शेळके हे ही येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय आणखी सदस्य आहेत. संपर्क साधला आहे. आम्ही पक्षाच्या सदस्यांचा सहया घेवून ठेवल्या होत्या. आम्ही यादी तयार केली होती. त्यापैकी एक यादी अजित पवार यांनी राज्यपालांकडे पाठवली असावी असा अंदाज आहे. त्या सहया अंतर्गत कामासाठी घेतल्या होत्या. पाठिंब्यासाठी नव्हत्या. त्यांना ५४ आमदारांच्या सहया आहेत असे भासवले असावे असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी त्यांनी पुलोदचा प्रयोगानंतर अर्थात १९८० साली ६ आमदार माझ्यासोबत शिल्लक राहीले होते. त्यानंतर सर्वांचा पराभव करत मला सोडून गेलेला आज एकही दिसत नसल्याचे आठवण त्यांनी मुद्दाम सांगितली.
Marathi e-Batmya