मुंबई : प्रतिनिधी
जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मांडली.
जून पासून शिक्षण सुरू करावे. शाळाच सुरू कराव्यात असे नाही. ऑनलाइन, ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट करत शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये. ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात असे निर्देश देत ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे, त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्टाने देशाला दाखवून द्यावे असे ते म्हणाले.
गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावीत. आज त्यांनी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली त्यात मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ञही उपस्थित होते.
या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.
Marathi e-Batmya