तानाजी सावंत म्हणाले, सत्तांतरानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी हाफकिन नावाच्या माणसाकडून औषधे घेऊ नका, महाराष्ट्राला भिकारी करायची ताकद आहे, खेकड्यांनी धरण पोखरले सारखी वादग्रस्त विधाने करत नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे गटाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल रविवारी आणखी एक विधान करत एकच खळबळ माजवली आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी सुरु केलेल्या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून सुरु करण्यात आलेल्या हिंदू गर्व गर्जना संवाद यात्रा काल रविवारी उस्मानाबाद मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री तानाजी सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना म्हणाले, तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, अशा शब्दांमध्ये विरोधकांना लक्ष्य केले. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील असा शब्दही दिला. मात्र विरोधकांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेले विधान वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

प्रमुख उपस्थिती म्हणून उस्मानाबादमधील कार्यक्रमाला तानाजी सावंत यांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यकर्त्यांशी हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे अशा मागण्या होत आहेत. अहो हे कोण आहेत? याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे तुम्हा-आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही, असं सांगत विरोधकांना लक्ष्य केले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका करताना सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, ‘दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच’. आम्हाला आरक्षण पाहिजेच. मलाही पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय, असं सांगायलाही ते विसरले नाही.

आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री २०२४ च्या आत आपल्याला पाहिजे तसं, टिकावू आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. हे वचन तुम्हाला देतो, असेही डॉ. तानाजी सावंत यांनी सांगत शब्द देऊन टाकला.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *