महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांना पाठवून दिलेल्या घटनेस अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी राज्यपालांनी अद्याप मंजूर केली नाही यावरून आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोनवेळा पत्रही पाठविले. तसेच याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून टीपण्णीही करण्यात आली. मात्र याप्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु हा याबाबतचा मुद्दा जेव्हाही राज्यपालांच्या भेटी दरम्यान उपस्थित केला जातो तेव्हा राज्यपाल एकच वाक्य बोलतात अजितजी… क्यूं फिकर करते हो असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील गौप्यस्फोट केला.
राज्यापाल कोश्यारी आणि आपली भेट झाली की राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नावे आलेली आहेत. विचार करत असल्याचे राज्यपाल सांगत आहेत.. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात भेटले तर करेंगे… करेंगे… अजितजी… क्यूं फिकर करते हो… असे त्यावेळी बोलतात असेही त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामध्ये कुणाला ढवळाढवळ करता येत नाही. त्याबद्दल निवडणूक आयोग निर्णय घेईल असेही ते म्हणाले.
शिर्डी दौर्यावर असताना पत्रकार ताराचंद म्हस्के यांना विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्यांचे पक्षात स्वागत अजित पवार यांनी केले. यावेळी सगळे मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने कारागृहातील कैद्यांसाठी राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित केली आहे. याचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लक्ष्मीकांत खाबिया यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाच्या यादीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कधीही मान्यता देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मविआला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असून आतापर्यत तरी या १२ आमदारांच्या नावा राज्यपालांनी अद्याप मान्यता दिलेली नाही.
Marathi e-Batmya